मुंबई (वृत्तसंस्था) मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने आगामी चित्रपटाची घोषणा केली. परंतु या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संपात व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत महेश मांजरेकर कोण आहेत? त्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान काय? असे प्रश्न उपस्थित करत चित्रपटावर आपला आक्षेप नोंदवला आहे.
महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन आक्षेप नोंदवला आहे. ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? अशी विचारणा केली आहे. तसंच लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं नाटक असल्याचं आरोपही केला आहे.
दरम्यान महेश मांजरेकरांनी सिनेमाचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे”.
















