मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मंदिर उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवण करुन देणारे राज्यपाल कोश्यारी हे सध्या सर्वांच्याच टीकेचे धनी बनले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिलेल्या चोख उत्तरामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’ असा सवाल राज्यपालांनी केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठामपणे उत्तर दिलं. ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?,” असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.