मुंबई (वृत्तसंस्था) शुक्रवारी रात्री ११ नंतर जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सेवा ठप्प झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. व्हॉट्सॲप केवळ भारतातच नाही जगभरातील सर्वच देशांमध्ये काही वेळासाठी ठप्प झालं होतं. यानंतर रात्री बारा वाजेच्या आधीच जवळपास ४५ मिनीटांनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा आधीसारखं काम करू लागलं. पण व्हॉटसअॅप का बंद होतं? या प्रश्नाचं उत्तर कंपनीने दिलेलं नाही पण पहिल्यांदाच स्पष्टीकरण मात्र दिलं आहे.
भारतासह बहुतांश देशात काल रात्री म्हणजेची शुक्रवारी ११ च्या सुमारास व्हॉट्सॲप अचानक बंद झालं. ना कुठे मेसेज जात होते ना येत होते. व्हिडीओ कॉलिंगही बंद. लोकांनी मोबाईल चालू बंद करुन बघितले पण काहीच उपयोग नाही. शेवटी व्हॉट्सॲप डाऊन झाल्याचं अधिकृतपणे कळवलं गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा व्हॉटसअॅप सुरु झालं. त्यावर कंपनीनं ट्विटरवर पहिल्यांदाच अधिकृतपणे वक्तव्य जारी केलं आहे, त्यात कंपनी म्हणते, तुमची जी असुविधा झाली त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी ती ४५ मिनिटं खूप मोठा काळ होता, तुम्ही धैर्य ठेवलंत त्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही परत आलो आहोत.
त्या ४५ मिनिटांसाठी फक्त व्हॉट्सॲप बंद होतं असं नाही तर फेसबूकचं मेसेंजरही बंद होतं आणि इन्स्टाग्रामचंही. म्हणजे SMS ची सवय मोडल्यानंतर फुकटात हे अॅप वापरायची सवय लागलेल्यांना अचानकच जगाशी संपर्क तुटल्याची भावना निर्माण झाली. बराच काळ नेमकं काय घडलं आहे. हेच कळंत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत लोकांमध्ये संभ्रम होता. पण व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुकवर लोकांचे व्यवसायही अवलंबून आहेत. त्यामुळे त्या ४५ मिनिटात अनेकांचं मोठं आर्थिक नुकसानही झालेलं आहे.
सिग्नलला झाला फायदा –
व्हॉट्सॲप डाउन झाल्याचा फायदा सिग्नल अॅपला झाल्याचं दिसलं. व्हॉट्सॲप डाउन झाल्यानंतर सिग्नलनं ट्वीट करत सांगितलं, की त्यांच्या यूजर्सच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. सर्वांचं स्वागत आहे. व्हॉट्सॲपला पुन्हा ठीक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसोबत आमचं सांत्वन आहे. टेक इंडस्ट्रीच्या बाहेरचे लोक हे कधीच समजू शकत नाहीत की विकेंडला डाउनटाइमची वाट पाहाणं किती विचित्र असतं.