नांदेड (वृत्तसंस्था) ‘छत्रपती शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही?’, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला विचारला आहे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात नोकर भरती प्रक्रियेचा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या प्रवर्गाची क्षमता वाढवून त्यात मराठा समाजाचा समावेश करावा, असेही मतप्रवाह सुरू आहेत. नांदेडमधील सभेला संबोधित करताना संभाजीराजे म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. त्यांनी फक्त मराठ्यांना आरक्षण दिले नाही. त्यावेळच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही? का मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे,’ असे संभाजीराजे म्हणाले.