मुंबई (वृत्तसंस्था) मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि महाराष्ट्रपुत्र क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानं पोस्ट केलेल्या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत. भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोचीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काळे तेल टाकत निषेध व्यक्त केला. या ट्विटला रिट्विट करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेते हे सहन करणार का? असा सवाल केला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आहे. केरळमधील युवक काँग्रेसनं थेट रस्त्यावर येत सचिनविरोधात निदर्शनं केली. कोची येथे सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतून त्याचा निषेध करण्यात आला. फडणवीस यांनी केरळमधील हे फोटो ट्वीट करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचा अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत मागील ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केल्यावर देशातील सेलिब्रिटी देखील व्यक्त होऊ लागले आहेत. देशातील काही क्रिकेटपटू व बॉलिवूड अभिनेत्यांनी रिहाना व ग्रेटाला सुनावलं आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नका, असं काहींनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरचाही यात समावेश आहे. त्यावरून सचिनसह सर्वच सेलिब्रिटींवर टीका होऊ लागली आहे. मागील ७० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? इतके दिवस कुठे होतात? असा प्रश्न लोक करू लागले आहेत. भाजपच्या विरोधकांनीही या सेलिब्रिटींवर तोंडसुख घेतलं आहे.
सचिन तेंडुलकरचं ट्विट
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ”भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,”असं ट्विट सचिननं केलं होतं.