मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या सत्ता स्थापनेसाठी भेटीगाठी सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र सत्ता स्थापन करायची असल्यास बंडखोर आमदारांचा गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांचा गट भाजप किंवा प्रहार राजकीय पक्षात विलीन करावा लागेल. नेमक्या याच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून बंडखोर आमदारांमध्ये मोठे मतभेद झाल्याची वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला. सुरुवातीला आवाहनाची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं. शिंदे यांनीदेखील शड्डू ठोकला. परंतू आता शिंदे गटात मतभेद असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय आमदारांपुढे आहे. मात्र आम्ही शिवसैनिकच, शिवसेनेसोबतच अशी भूमिका घेणाऱ्या आमदारांना आता हा पर्याय धोक्याचा वाटत आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ आमदारांमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. ते मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं वृत्त ‘साम’ टीव्हीने दिले आहे. एवढेच नव्हे तर बंडखोरांपैकी १६ आमदार संपर्कात असल्याचा दावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे.