नागपूर (वृत्तसंस्था) ब्लास्टिंगमुळे सोमवारी हरिहरनगर कांद्री येथील कोटेकर यांचे घर कोसळले. यात मलब्याखाली दबून त्यांचा व त्यांच्या सहा वर्षीय मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कमलेश गजानन कोटेकर (३५) व यादवी कमलेश कोटेकर (०६, रा. हरिहरनगर, कांद्री) अशी मृतकांची नावे आहेत. कमलेश यांचे धर्मराज शाळेसमोर सलून असून, यादवी ही शिक्षण घेत होती.
कन्हान-कांद्री क्षेत्रातील संलग्न भागात वेकोलितर्फे माती टाकून कृत्रिम टेकड्या तयार करणे सुरू आहे. या टेकड्यांनी विशाल रूप घेतले आहे. वेकोलि क्षेत्रातील टेकड्यांच्या आतील भागात ब्लास्टिंग केले जात आहे. ज्याची तीव्रता अधिक असल्याने कंपनांमुळे संलग्न क्षेत्रातील घरांना भेगा पडत आहेत. यासंदर्भात अनेकदा नागरिकांनी तक्रार केली. दरम्यान, सोमवारी नाभिक बांधवांचे दुकान बंद असते म्हणून कांद्री येथील कटिंगच्या दुकानात न जाता कमलेश कोटेकर घरीच होता. केजी २ मध्ये शिकणारी सहा वर्षीय यादवी कोटेकर ही शाळेतून घरी आली होती. नंतर बापलेकीने जेवण केले. दुपारी कवेलूच्या घरात झोपी गेले. लहान मुलगा आजीबरोबर घराबाहेर खेळत होता. पत्नी शेतात कामाला गेली होती. अचानक वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे आधीच क्षतिग्रस्त झालेले कमलेश कोटेकर यांचे झोपडे दुपारी एक वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले अन् झोपेतच बापलेकी घराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे पारशिवनीतील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ते यादवी व कमलेशला वाचवू शकले नाहीत. दोघांनाही उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र नागरिकांचा संताप बघता पोस्टमार्टम झाले नव्हते. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी जि.प सदस्य योगेश वाडीभस्मे व कांद्रीवासीयांनी वेकोलि क्षेत्रात ठिय्या मांडून मृतकांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आंदोलन केले. वेकोलिचे अधिकारी घटनास्थळी येण्यास तयार होत नव्हते. मृतक कमलेश कोटेकर हे सलूनच्या दुकानावर परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. घरचा कर्तापुरुष व छोट्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पत्नी व त्याच्या परिवारावर संकट कोसळले आहे