नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताच आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या २ लाख ५९ हजार १७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १७६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत असलं, तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढ होत असल्याने दुप्पट रुग्णवाढीचा कालावधीही झपाट्याने कमी झाला आहे. देशात रविवारी २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यात सोमवारी घट झाली आहे. मात्र, मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. रविवारी १,६१९ जणांचा मृत्यू झाला होता. १ हजार ७६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकाच दिवसात मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा अधिक वाढला आहे.