नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नवनवे उच्चांक रचत आहे. देशात गेल्या २४ तासांत २,९५,०४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २०२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान १,६७,४५७ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. तसंच २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.