जळगाव (प्रतिनिधी) “बाबा, सगळे जरी व्हाई गय तरी आपले नशीब थोडी कुणी ली गय, परत उभे राहुत, काळजी करू नका, माय, हाऊ तुना पोरगा शे ना, आठ दिवस मा तुले घर उभे करी देस काळजी करू नको” असा अहिराणीत संवाद साधत आमदार मंगेश चव्हाण यांनी पुरग्रस्त वृद्ध दांपत्यांना धीर दिला.
दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी अतिवृष्टीच्यानंतर सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत थांबून प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने पुरग्रस्तांना मदत केली. अतिवृष्टीच्या दुसऱ्या दिवशी आमदार चव्हाण चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या पाहणीची सुरुवात हिंगोणेसिम येथून केली. त्यानंतर हिंगोणे खुर्द, वाघळी, पातोंडा, एकलहरे, मजरे, खेर्डे, बाणगाव, सांगवी, शिवापूर आदी गावांना भेटी देऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अनेक कुटुंबांची घरेच वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. सध्या या कुटुंबांनी जिल्हा परिषदेच्या शाळा, मंदिरात आसरा घेतला आहे. तरी त्यांना त्यांच्या हक्काचे घर केव्हा मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“दादा सगळे घर वाही गय, दोन पैसा देयेत त्या बकऱ्या वाही गयात, आम्ही म्हातारासनी कुठे जावान” अशा अहिराणी भाषेतील शब्दात बाणगाव येथील पुरग्रस्त वृद्ध दांपत्याने आपल्या भावना मांडत अश्रूंचा बांध आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोर सोडला. यावेळी आमदार चव्हाण यांनी देखील त्यांना जवळ घेत “बाबा, सगळे जरी व्हाई गय तरी आपले नशीब थोडी कुणी ली गय, परत उभे राहुत, काळजी करू नका, माय, हाऊ तुना पोरगा शे ना, आठ दिवस मा तुले घर उभे करी देस काळजी करू नको” असा अहिराणीत संवाद साधत धीर दिला.
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील ५० गरजू कुटुंबाना येत्या ८ दिवसात हक्काच्या निवाऱ्यासाठी ५० घरे उभारून देणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच या कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य, कपडे देखील उपलब्ध करून देण्यात येतील असे, चव्हाण यांनी सांगितले.