जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निघुण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय-२७) रा. कासमवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या ३ तासात मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कासमवाडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील हा तरुण एका कंपनीत कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ज्ञानेश्वर पाटील या तरुणाचे आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी किरकोळ वाद होते. दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास नाना पाटील हा घराजवळील एकता मित्र मंडळकडे उभा असताना दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने त्याच्या पोटावर, मांडीवर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ७०६/२०२५ बी.एन.एस कायदा कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांच्या शोधासाठी तत्काळ पथक रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड थांबून होते.
जुना वाद उफळला
कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील याचे घरासमोर होणाऱ्या काही तरुणांची जुना वाद होता. दोन जणांनी जुन्या वादातून त्याच्या पोटावर तसेच पायाच्या मांडीवर तलवार आणि कोयत्याने वार केले. यात ज्ञानेश्वर उर्फ नाना हा गंभीर जखमी झाला. डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.
नशिराबाद मधून घेतले ताब्यात
एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी हवालदार नितीन बाविस्कर, पोलीस नाईक किशोर पाटील, छगन तायडे, रविंद्र कापडणे यांचे पथक तयार करून रवाना केले होते. काही तासांतच गुन्हयातील मुख्य संशयीत आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु (वय-२७) रा. कासमवाडी जळगाव यांस शिताफिने नशिराबाद परीसरातुन ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाई कामी एमआयडीसी पो. स्टे जळगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
















