सोलापूर (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात अधिकारी व फिर्यादी, पोलिस व आरोपी यांच्यातील संवादसह घटनांची खरी परिस्थिती वरिष्ठांना पडताळता येणार आहे.
पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला आल्यानंतर पोलिसांनी पैसे मागितले, अरेरावीची भाषा वापरली, व्यवस्थित वागणूक दिली नाही, पोलिसांनी मारहाण केली, पोलिसांनी फिर्याद घेतलीच नाही किंवा आम्ही म्हणतोय तशी फिर्याद घेतली नाही, असे आरोप अनेकदा केले जातात. त्याची चौकशी करताना काहीच पुरावे नसल्याने ते आरोप खरे असले तरीही वस्तुस्थिती समोर येत नाही. काहीवेळा खोट्या आरोपांमुळे पोलिस खात्याला बदनामीही सहन करावी लागते. अनेकदा पोलिस आणि फिर्यादीत वादावादी होते. यावर उपाय म्हणून आता शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच आता ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे लाच घेणे किंवा पैशांची मागणी करण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.