जळगाव (प्रतिनिधी) एखाद्याच्या लग्नसमारंभात, अंत्ययात्रेत जातो, अनेक कार्यक्रमात जातो तसंच फडणवीस आणि राऊत भेट झाली असावी. राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो, अशी प्रतिक्रिया आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जळगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी उत्तरं दिली. ना. पाटील पुढे म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना यांचा एकमेकांशी ओढा वाढला की नाही, याबाबत मी मत मांडू शकत नाही, तो ओढा तयार करण्याची जबाबदारी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे. नेते जो आदेश करतील तो आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे गैर नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात भेटीत राजकीय उद्देश नव्हता. सामनाच्या मुलाखतीसाठी त्यांची भेट झाली, हे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे असले तरी एक नेता दुसऱ्या नेत्याला भेटू शकतो. दोघंही नेते हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तीक कारणासाठी देखील भेटू शकतात. यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे गैर असल्याचेही ना. पाटील म्हणाले.