धरणगाव (प्रतिनिधी) शहरात प्रांताधिकारींनी लावलेली संचारबंदी एक दिवसाने वाढवली आहे. त्यामुळे आज सकाळी 8 वाजेपासून तर शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढले.
शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रण नुकतेच मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. त्यानंतर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार होते.
नेमका काय आहे विषय
गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम १४४ लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी घेतली सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसासाठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली होती.
शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त कायम !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
जाणून घ्या…नेमकं काय म्हटलंय आदेशात
विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग एरंडोल, यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02/11/2022 चे रात्री 08.00 वाजेपासुन दिनांक 04/11/2022 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केले होते. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यास संचारबंदीमुळे मोठी मदत झाली त्यामुळे संचारबंदी एक दिवसांनी वाढवून द्यावी असा अहवाल धरणगाव पोलीस निरीक्षकांनी दिला होता त्यानुसार शनिवार सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. सदर आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगाव शहरातून जानारे मुख्य रस्त्यावरुन वाहतुक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही.
गावासह सोशल मीडियातही आवाहन
प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे. तसेच एक ऑडीओ क्लिप देखील टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ईशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गावात संचारबंदी वाढविण्यात आल्याबाबत दवंडी देखील देण्यात येत आहे.