जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांसोबत संवाद साधत होते.
गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल, असे ना. पाटील म्हणाले.