मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यावरींवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केल्याने भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावरून सामनातून समाचार घेण्यात आला. ‘राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात भाजप आणि मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला. त्यातले काही वळू रस्त्यावर उतरल. ‘शिवसेना आता काय करणार?’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे’, असं म्हणत शिवसेने टोला लगावला आहे.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला असल्याचे त्यांनी म्हटले. वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवालही शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढार्यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल असेही शिवसेना ठाकरे गटाने सुनावले.
राज्यपाल कोश्यारींनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुखअयमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ब्र काढायला तयारी नाहीत. शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे?, असा सवाल रोखठोक सवाल शिवसेनेने केला आहे.