चोपडा (प्रतिनिधी) दीड लाखांचा कांदा खरेदी करुन शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत म्हणून लासलगावच्या दोन जणांविरुद्ध रविवारी चोपडा शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, चहार्डी येथील शेतकरी विजय रामदास सोनवणे यांनी एप्रिल २०२२ मध्ये एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा १७ टन कांदा हा गावातील उदय रमेश मोरे यांच्यावर विश्वास ठेवून त्याचे नातेवाईक आरोपी राजू वाल्मीक कदम (रा. लासलगांव ता. सटाणा जि. नाशिक) यांना विक्री केला होता. त्यावेळी शेतकऱ्यास ५ हजार देण्यात आले. मात्र उर्वरित १ लाख ४६ हजार रुपये नंतर देतो असे सांगितले. परंतु दोघा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यास रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यानंतर विजय रामदास सोनवणे यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप राजपूत हे करीत आहेत.