जळगाव (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाळधी या त्यांच्या गावी पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर माजी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांची आपलीच शिवसेना खरी असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही आम्हालाच मिळेल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. दूर गेलेल्या नाराज शिवसैनिकांना आपण लवकरच भेटणार आहोत. खरी आणि शिवसेना पुन्हा उभी करायची असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं.
वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.