भोपाळ (वृत्तसंस्था) इंदूरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही बस अमळनेर डेपोची असल्याची माहिती जळगाव एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. इंदुरवरून ही बस महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे येत होती. ही बस अमळनेर येथून इंदोर येथे मुक्कामी बस असते. ती आज सकाळी परत अमळनेरकडे यायला निघाली होती. जळगाव एसटी महामंडळाचे डीसी श्री. जगनोर यांनी बस अमळनेर डेपोची असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून सायंकाळपर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध होईल, असे सांगितले आहे. तर मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील किती जण आहेत ?, याबाबत अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 12 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यासोबतच १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.