जळगाव (प्रतिनिधी) गुजरातमधील सुरत शहरात २००१ मध्ये प्रतिबंधित स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशवादी संघटनेच्या बैठकीत सहभागी झाल्याच्या गुन्ह्यातून १२७ जणांविरुद्ध ‘अनलॉफुल ऍक्टीव्हीटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने सर्व संशयितांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. यात जळगावच्या तिघांचा समावेश आहे.
गुजरातमधील सुरत येथील कोर्टाने यूएपीए अंतर्गत २० वर्षांच्या जुन्या प्रकरणातील १२७ लोकांना दोषमुक्त केले आहे. डिसेंबर २००१ मध्ये स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया” (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेच्या बैठकीला हजेरी लावल्याचा आरोप या लोकांवर होता. परंतू पुराव्यांअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सुरतमधील राजश्री हॉलमध्ये एकत्र जमल्यानंतर या सर्वांना सिमीच्या बैठकीला हजर राहिल्याच्या आरोपातून अटक करण्यात आली होती. चार्जशीटमध्ये स्पष म्हटले होते की, संबंधित लोकांना अटक करण्याची परवानगी तत्कालीन राज्य सरकारने दिली होती. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले नव्हते. एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर १२० लोकांना जामीन मिळाला होता. तर ७ संशयिताना सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता. या खटल्यात २७ साक्षीदार तपासण्यात आले होते.
या खटल्यातील १२७ पैकी सात आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. पाच वगळता इतर सर्व जामिनावर सुटले आहेत. हे पाच आरोपी सध्या स्वतंत्र प्रकरणात तुरूंगात आहेत. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सरकारी पक्ष “विश्वासार्ह आणि समाधानकारक” पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला आहे. आरोपी सिमीचे सदस्य आहेत आणि बंदी घातलेल्या संघटनेच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी जमले होते, हे सिद्ध झाले नाही. आरोपी शैक्षणिक कार्यक्रमासाठी जमले होते आणि त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. त्यामुळे आरोपींना यूएपीए अंतर्गत दोषी ठरवले जाऊ शकत नाही. मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एन. दवे यांनी संशयाचा फायदा घेत सिमीचे सदस्य म्हणून अटक केलेल्या १२२ लोकांना निर्दोष सोडले.
निर्दोष आरोपींमध्ये जळगावमधील तिघांचा समावेश
सुरत खटल्यात निर्दोष सुटलेल्या १२७ आरोपींमध्ये जळगावमधील तिघांचा समावेश आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघं जिवंत आहेत. त्यात अस्लम शेख परवेज (मयत), फारुख उस्मान शेख. कय्युम शहा यांचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव दहशतवादविरोधी पथकाने मार्च २०१६ मध्ये तांबापुरातील शेख असलम शेख उर्फ पेंटर याला बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड वापरत असल्याप्रकरणी अटक केली. शेख असलमवर २००१ मध्ये गुजरातमधील आठवा लाईन पोलीस ठाण्यात ‘अनलॉफुल ऍक्टीव्हीटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट’नुसार गुन्हा दाखल असल्यामुळे या प्रकरणाला ‘सिमी’चा रंग लागला. सुरुवातीला सिमीच्या आरोपीवर बनावट सिमकार्ड वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर ही कारवाई ‘सिमी’शी संबंधित नसल्याचे खुद्द पोलीस प्रशासनाने सांगितल्यावर या प्रकरणाचा गुंता वाढला होता.
यातील संशयित शेख असलम हा नाशिक येथील दोंदे नामक व्यक्तीच्या नावावर ८९८३८०७*** या क्रमांकाचे सिमकार्ड वापरत होता. सिमकार्ड घेताना रहिवास पुरावा सचिन दोंदे यांचा आहे, तर फोटो मात्र शेख असलम याचा मुलगा मोहसिन अहेमद शेख याचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध जळगावच्या औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फसवणुकीचा (कलम ४२०) असून यात अन्य दुसरे कोणतेही कलम नाही. मात्र शेख असलम याला अटक केल्यानंतर जणू काही ‘सिमी’च्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. मुळातच शेख असलम याच्यावर २००१ मध्ये गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर ‘सिमी’शी संबंधित बैठकीत भाग घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. यात त्याच्यासह सुमारे १२७ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते.