मुंबई (वृत्तसंस्था) फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर (BJP) केले आहे.
हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे. मागील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना खासदार संजय राऊत यांनी हरयाणातील एन नरवर या दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की एन नरवर हा हरयाणातील एक दूधवाला आहे. मी ईडीला विचारतो की, या नरवरला ओळखता का? हा दूधवाला आहे. या दूधवाल्याकडे ७ हजार कोटींची संपत्ती आहे. हा दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा बनला. त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे.
भाजप सरकारवर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप
दूधवाला नरवर याचे नाव घेऊन खासदार राऊत यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा हा दूधवाला नरवर महाराष्ट्रात ये-जा करत होता. त्यानंतरच त्याची ही मालमत्ता तयार झाली, असा गंभीर आरोप करताना हे मनी लाँड्रिंग कोणी केले याबाबत मी तक्रार करणार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.