नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गाजलेल्या टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी देशाचं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्या प्रकरणी आता कॅगचे तत्कालीन प्रमुख विनोद राय यांनी त्या संबंधी बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची विनाशर्त माफी मागितली आहे.
देशाला हादरवून टाकणाऱ्या टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कॅगच्या अहवालातून तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव हटवावे यासाठी संजय राऊत यांनी आपल्यावर दबाव आणल्याचे वक्तव्य विनोद राय यांनी २०१४ साली एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत केले होते. या वक्तव्यावरून निरुपम यांनी विनोद राय यांच्यावर दिल्लीतील पतियाला न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता.
या खटल्याने अडचणीत आलेल्या विनोद राय यांनी संजय निरुपम यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य अनाहुतपणे व चुकीने केले होते, त्याची बिनशर्त आपण माफी मागतो असे दिल्लीतील पतियाला न्यायालयाला सांगितले. मुलाखतीत व्यक्त केलेली मते चुकीने झाली होती. त्याचा निरुपम व त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास व वेदना झाल्या. या बद्दल मी त्यांची व कुटुंबियातील सर्वांची बिनशर्त माफी मागत असून त्यांच्या कुटुंबांचे मी शुभ चिंततो असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.
आता राय यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी – निरुपम
या माफीवर आपली प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी राय यांना टोला मारला. राय यांनी आता संपूर्ण देशाची माफी मागावी. त्यांनी सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे यूपीए सरकारने कोळसा व स्पेक्ट्रम घोटाळा केला असा समज देशभर पसरला, असे निरुपम म्हणाले.