नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवीन कृषी कायद्याविरोधात रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब समोर आली आहे. सिंघु बॉर्डर वर रात्री एका संशयित शूटरला पकडण्यात आले आहे. या शूटरने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला असून २६ जानेवारीला चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे सांगितले आहे. हा शूटर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची केंद्र सरकारसोबतची अकरावी बैठकही निष्फळ ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदे तात्पुरते निलंबित करत समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरची ही दुसरी बैठक होती. मात्र, ती देखील निष्फळ ठरली आहे. याचवेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला असून शुक्रवारी रात्री घुसलेल्या एका शुटरला पकडण्यात आले आहे. या कथित शुटरला चेहरा झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले. सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या शुटरला पकडले आहे. हा शुटर शेतकरी नेत्यांना मारण्यासाठी आला होता. त्याने मीडियासमोरच दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या शूटरने सांगितले की, २६ तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर २३ ते २६ जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या. तसेच त्याच्यासोबत आणखी काही जण असून यामध्ये महिलाही आहेत. या महिलांचे काम आंदोलकांना भडकविण्याचे होते. या शुटरने आंदोलनातही गोंधळ घालण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे.
शूटरने सांगितले की, २६ तारखेला चार लोक स्टेजवर असणार होते. त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश होते. यासाठी या चार लोकांचे फोटो मला देण्य़ात आले होते. हे सारे ज्या व्यक्तीने सांगितले तो राई पोलीस ठाण्याचा एसएचओ प्रदीप आहे. तो नेहमी त्याचा चेहरा झाकून ठेवायचा आणि बोलायचा, असा दावा शूटरने केला. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कथित कट उघड करणाऱ्या त्या शूटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
















