जळगाव (प्रतिनिधी) देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएमकार्डसह बँकखात्यासंबंधित डाटा मिळवून त्या माध्यमातून ४१२ कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीतील आणखी चार आरोपींना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.
रामानंदनगर पोलिसांनी या ऑनलाईन चोरीचा पर्दाफाश केला होता. त्यानुसार ४१२ कोटी रुपये सायबर चोरीच्या प्रयत्नातील या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्वरलाल पाटील (वय ४२ रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय ३५ रा. देवपूर, धुळे) या दोघांना सापळा रचून पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्याच्याकडून इतरांची नावे निष्पन्न करण्यात येवून त्यांच्या शोधार्थ तीन ते चार पोलिसांची पथके रवाना करण्यात करण्यात आली होती. तर मनिष भंगाळेला सोबत घेवून नाशिकला गेलेल्या पथकाने मनिश भंगाळेच्या सांगण्यावरुन संशयित दिपक चंद्रसिंग राजपूत, भारत खेडकर या दोघांना बोलावून सापळा रचून अटक केली. दुसरीकडे शनिवारी जयेश मनिलाल पटेल (वय ४७ रा. चिखली, जि.नवसारी गुजरात), दिपक चंद्रसिंग राजपूत (वय ३६ रा. पंचवटी, नाशिक), भारत अशोक खेडकर (वय ४७) व रविंद्र मनोहर भडांगे (दोन्ही रा. जेलरोड, नाशिक) या चार जणांना अटक केली आहे. जयेश पटेल यास आज न्यायालयाने २१ ऑक्टोपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.