नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केलं होत. त्यांनतर आता चक्क स्टेट बँक ऑफ इंडियासह आठ बँकांना तब्बल ४३०० कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून गेल्या २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपींनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना ४८३७ कोटींची फसवणूक झाली आहे.
सीबीआयचे प्रवक्ते आर जी कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपांनुसार कर्जदार कंपनीच्या संचालकांनी असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रे़डिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली”.