पुणे (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील राजगुरु नगरमधील ८६ व्या वर्षी वडिलांनी लग्न करण्याच्या हेतूने वधू वर सूचक मंडळात नाव नोंदणी केली. याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रॉपर्टीत वाटेकरुच्या भीतीने पोराने बापाला संपवल्याचा आरोप आहे.
वडिलांनी दुसरे लग्न केले, तर समाजात वावरताना अपमान होईल. शिवाय मालमत्तेत हिस्सेदार होईल, या रागाने मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर घरातील सुरीने वार केले. सुरी बोथट असल्याने गळा चिरला जात नव्हता. म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवलं, अशी माहिती खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. गुरुवारी खुनानंतर मुलाने खेड पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची माहिती दिली. तोच फिर्यादी झाला आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय ८६ वर्ष) असं मयत वडिलांचं नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे (वय ४७ वर्ष, रा. राजगुरुनगर) असं आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.