धरणगाव ( प्रतिनिधी ) : पाळधीकडून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेवून जाणारा आयशर महामार्गावर उलटला. त्यामुळे एकेरी वाहतुक सुरु झाल्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. हा विचित्र अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बांभोरीजवळील बायपासवर घडली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेवून जाणारा (एमएच १९, सीवाय ८८९२) क्रमांकाचा आयशर भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. अपघाताची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि प्रशांत कंडारे हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत कार्य राबविण्यास सुरुवात केली. महामार्गावरील वाहतुक ठप्प झाल्यामुळे त्यांनी ती वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच१२, बीझेड ६१८९) क्रमाकांचा ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. यावेळी त्या मागून येणारे वाहने देखील आदळले असून यामध्ये कारचा देखील समावेश आहे.
चार किमी पर्यंत वाहनांच्या रांगा
वाहतुक ठप्प होत असल्याने दुसऱ्या बाजूने वळविलेल्या मार्गावर देखील अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूने होणारी वाहतुक खोळंबली होती. त्यामुळे महामार्गावर सुमारे तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली अपघात ग्रस्त वाहने
अपघातामुळे महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्यामुळे काही वाहनधारकांनी कचरा डेपो पासून वाहने पुन्हा जुन्या महामार्गाकडे वळवून पर्यायी मार्गाचा वापर केला. परंतू अनेकांना मार्गच न मिळाल्याने त्यांना तेथेच रांगेत उभे राहून महामार्ग सुरळीत होण्याची वाट पहावी लागली. या वेळी पोलिसांनी एक क्रेन बोलावून घेत अपघातग्रस्त वाहने हटवित महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.















