चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : तालुक्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आज उपखेड शिवारात भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना धीर दिला. अचानक आलेल्या या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी भूमिका आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.
या पाहणीवेळी प्रांताधिकारी श्री.ज प्रमोद हिले, तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. अभिषेक लगड, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, तलाठी तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आमदार चव्हाण यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देत नुकसानभरपाईचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.















