
धरणगाव (प्रतिनिधी) – येथील धरणगावकरांच्या 50-60 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गेली सहा दशके भाड्याच्या इमारतीत खितपत पडलेल्या धरणगाव पोस्ट ऑफिससाठी आता शहरातीलच मंजूर शासकीय जागेवर कायमस्वरूपी इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देऊन City Survey No. 5157 या जागेवर नवीन, सुसज्ज व आधुनिक टपाल कार्यालय तातडीने उभारण्याची मागणी केली आहे.
पिढ्यानुपिढ्यांचा प्रश्न..!
धरणगाव पोस्ट ऑफिस 1950-60 च्या दशकापासून आजतागायत भाड्याच्या जागेत सुरू आहे. दर 2-4 वर्षांनी जागा बदलल्याने ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना सततचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पत्ता बदल, व्यवहार खंडित होणे आणि कागदपत्रांची अडचण यामुळे नागरिक त्रस्त होते.
विकासाच्या वाटेत अडथळा
पोस्ट ऑफिस ही केवळ टपालाची सेवा नाही. बचत खाती, पेन्शन, आधार, पॅन, पार्सल, मनीऑर्डर यांसारख्या लाखो व्यवहारांची ती जीवनरेखा आहे. झपाट्याने वाढणाऱ्या धरणगाव शहराच्या प्रतिमेशी विसंगत असलेली भाड्याची इमारत आता बदलणे गरजेचे बनले आहे.
आता मिळणार कायमस्वरूपी ठिकाणा मंजूर झालेल्या City Survey No. 5157 या शासकीय जागेवर नवीन पोस्ट ऑफिसची इमारत झाल्यास हा 50 वर्ष जुना प्रश्न कायमचा निकाली निघेल. यासाठी संबंधित विभागाशी तातडीने पाठपुरावा करावा, अशी आग्रही विनंती प्रवासी मंडळाने खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे केली आहे.
“धरणगावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सन्मानासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे” असे मंडळाने निवेदनात म्हटले आहे.














