वरणगाव (प्रतिनिधी) जेवण झाल्यानंतर घराबाहेर निघालेला मुलगा अर्धा तासानंतरही घरी परत न आल्याने आई वडीलांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, घराच्या प्रवेशव्दारा जवळच पाण्याच्या हौदात मुलाचा मृतदेह सापडल्याची हृदयदायक घटना वरणगावातील सरस्वती नगर भागात मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, मुलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
मित्रांसोबत खेळायला गेला…पण घरी परतलाच नाही !
हेमेंद्र बडगुजर (मुळ रा. दोंडाईचा, ह.मु. वरणगाव) हे सरस्वती नगर भागात आपली दोन मुले व पत्नीसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सांयकाळी ७ वाजेदरम्यान परिवारातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर हेमेंद्र बडगुजर यांचा पाच वर्षीय लहान मुलगा कर्णव लगतच्याच मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर निघाला. अर्धा तास होऊनही कर्णव घरी न आल्याने आई- वडील व भावाने त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो आढळून न आल्याने शेजारील रहीवाशीही त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनीही शोधाशोध सुरू केली.
पाण्याच्या हौदात सापडला
बडगुजर यांच्या घराच्या प्रवेशव्दारा जवळ जमिनीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात शोध घेतला असता कर्णव हा पाण्याच्या हौदात आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कर्णवला मृत घोषित केले. या घटनेने बडगुजर परिवारासह समाजमन सुन्न झाले असून बुधवारी कर्णववर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाणी टंचाईने घेतला कर्णवचा बळी !
शहरात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात बिकट झाली असून नगर परिषदेकडुन दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो. यामुळे नागरीकांना पुरेपुर पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने हेमेंद्र बडगुजर यांनी घराचे बांधकाम करतानांच घराच्या प्रवेशव्दारात जमिनीत लहानशा जागेत ६ बाय ६ आकाराचा पाण्याचा हौद बांधून घेतला होता. तसेच त्यावर लहानसे झाकण ठेवण्यासाठी जागा ठेवण्यात आल होती. त्यात चिमुकला कर्णव बुडाला.