धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कवठळ येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली आहे. शरद खंडू पवार (वय ५७) रा. कवठळ ता.धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शरद पवार हे आपल्या पत्न ी, दोन मुलं व सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतलेली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. दरम्यान या कर्जबाजारीमुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. दरम्यान गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी चहापाणी करून घरातून शेतात जाण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांचा मुलगा मयूर पवार हा सकाळी १०.३० वाजता शेतात गेला, त्यावेळी वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील मजुरांना बोलवून खाली उतरत तातडीने जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.