जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यात पळसोद येथे तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २६ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सुपडू बळिराम चौधरी असे मृताचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
याबाबत माहिती अशी की, सुपडू बळिराम चौधरी (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी बाराच्या सुमारास घडली. शेतकरी सुपडू चौधरी मंगळवारी बैलांना धुण्यासाठी तापी नदीवर गेले होते. काठावरच कपडे व बूट काढले. बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैल धूत असताना एक बैल सुपडू चौधरी यांना खोल पाण्यात घेऊन गेला व त्या ठिकाणावरून त्यांना परतता आले नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार पळसोद गावातील युवराज वाघ यांच्या लक्षात आला. नंतर घटनेची माहिती गावभर पसरली व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. या घटनेबाबत पोलिसपाटलांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृत सुपडू चौधरी यांच्या मागे पत्नी मंजूबाई, मुलगा अनिल, दोन मुली, सून, नातवंडे आहेत.