विरार (वृत्तसंस्था) राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे विरारमधील कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत.
नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण ३९ रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्यानं ही भीषण आग लागली. त्यानंतर आयसीयूतील ४ रुग्ण आणि नर्सिंग स्टाफ बाहेर आले. तर सर्व नॉन कोविड रुग्ण सुखरुप असून त्यांना इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे.