धानोरा, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील यावल बसस्थानक परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी चक्क सात दुकाने व लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होता व नेहमीप्रमाणे वीजपुरवठाही बंद होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल बसस्थानक परिसरातील दुकाने फोडली. अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन त्याने प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सद्गुरू दूध उत्पादक सोसायटी ऑफिस व शेजारील खोली असलेल्या या सर्व दुकानांची टॉमीने कुलूपे तोडून रोख रक्कम, चिल्लर व तर लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार यांचे बंद घरात चोरी केल्याची घटना घडली.
यात अनेक दुकानदारांच्या दुकानातील चिल्लर तसेच सूर्यवंशी टी स्टॉलमधून दोन हजार रुपये व सिगारेटची पाकिटे असा ऐवज चोरांनी लंपास केला. पहाटे चार वाजता प्रशांत अंबादास महाजन हा दूध काढण्यासाठी जात असताना त्याच्या लक्षात आल्यावर त्या दुकानदारांना कळवले. दुकानदारांनी आपल्या दुकानांकडे धाव घेत पोलिस पाटील रवींद्र कोळी यांना बोलावून घेतले. त्यांनी पाहणी करून तत्काळ अडावद पोलिस ठाण्यात माहिती दिली.
मात्र, सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून चोरीची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी न करता, या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अडावद पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
















