जळगाव (प्रतिनिधी) आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटूंबांच्या ‘उभारी’ साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी झालेल्या ६ व्यक्तीना शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.
कोव्हिड-१९ मुळे मृत पाडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास ५० लाखाचे सानुग्रह मंजूर !
जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय जळगाव यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै.नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) राहणार शिरसोली यांचा कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने दि. २८ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आठवड्या भरात कै. नाना लक्ष्मण वाघ यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस/ कायदेशीर वारसास ५० लाख रुपये इतकी रक्कम सानुग्रह सहाय्य म्हणून धनादेशाद्वारे प्रधान करण्यात येणार आहे
जळगाव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय मदतीने वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, दुध संघ संचालक रमेश पाटील,नंदलाल पाटील, अर्जुन पाटील, जना आप्पा कोळी , शिवराज पाटील, रवि कापडणे, सचिन पवार, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, महसूल सहाय्यक सौ. जयश्री मराठे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन पाटील यांनी केले. तर आभार महसूल सहाय्यक सौ. जयश्री मराठे यांनी मानले. यानंतर मृत्यूला कवटाळलेल्या 2 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये असे धनादेश वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. याच कार्यक्रमात पशुहानी झालेल्या तालुक्यातील ६ पात्र धारकांना धनादेश वाटप करण्यात आले.