अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या वळणावर प्रवासी रिक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवासी कलाबाई बुधा पाटील (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कलाबाई पाटील या कामानिमित्त खासगी प्रवासी रिक्षाने अमळनेर येथून आपल्या गावी जात होत्या. अमळनेर बसस्थानकात जवळील वळणावर रिक्षा चालक राजेंद्र रामदास भील याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उललटी झाली.
या अपघातात कलाबाई पाटील खाली फेकल्या गेल्या व रिक्षाखाली दाबल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मयत महिलेचा पुतण्या योगेश रघुनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक राजेंद्र भील याच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे ह्या करीत आहेत.