जामनेर (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रूग्णालयात आज ऑक्सीजनचा साठा संपल्याने १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. यात हॉस्पीटलमध्ये जाण्याआधीच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे जामनेरात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून आज जामनेरातही ऑक्सीजनचा तुटवडा दिसून आला. जामनेर उपजिल्हा रूग्णालयात ५२ बेडची व्यवस्था असून १८ ऑक्सीजन बेड आहेत. सर्व बेड फुल्ल असून दररोज ३५ सिलेंडरची आवश्यकता असतांना केवळ २० ते २५ सिलेंडरचाच पुरवठा होत होता. त्यामुळे दिवसा १२ व रात्री १० अशाप्रकारे ऑक्सीजन पुरवून रूग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न रूग्णालय प्रशासनाचा सुरू होता.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी प्रत्येक तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. मात्र त्यानंतरही पुरवठा झाला नसल्याने अखेर शुक्रवारी जामनेर उपजिल्हा रूग्णालयातील २० पैकी १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासकीय व खाजगी मिळून आठ रूग्णवाहिकांची व्यवस्था केली. एका रूग्णवाहिकेत दोन रूग्णांना ऑक्सीजन लाऊन रवाना केले. दरम्यान याचवेळी ढालसिंगी येथील महिलेचे ऑक्सीजन सॅच्युरेशन दाखल केल्यापासूनच अत्यल्प होते. परिस्थीती नाजूक असल्याने एकाच महिलेला १०८ रूग्णवाहिकेत टाकून ऑक्सीजन लावून जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला नेत असतांना तिचा गारखेड्याजवळ मृत्यू झाला. मृत्यु झाल्याचे कळताच रूग्णवाहिका जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणला. यावेळी संतप्त नातेवाईक अधिक्षक विनय सोनवणे व अन्य वैद्यकीय अधिकार्यांवर धावून गेले.