छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणास मारहाण करीत पोटात चाकू भोसकून खून करण्यात आल्याची घटना इटखेडा येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. अतुल बाबासाहेब खाडे (२९, रा. ईटखेडा, मोदीनगर, पैठण रोड) असे मयताचे नाव आहे. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर विशाल कळकुंभे, रोहन बनकर उर्फ गोट्या, वैभव उगले उर्फ राधे, सुशांत उपदेशे (सर्व रा. उस्मानपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
याप्रकरणी मयत अतुल खाडे याची आई शशिकला खाडे (४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिन्यापूर्वी फिर्यादी महिला आपली मुले अक्षय, अमर, अतुल आणि सुमीत यांच्यासह मोदीनगर परिसरात किरायाच्या घरात राहण्यासाठी आले होते. काही दिवसांपासून विशाल कळकुंभे आणि त्याची आई हे विनाकारण वादविवाद घालत असल्याचे मुलगा अतुल याने सांगितले होते. त्यावर आईने विशाल सोबत राहू नको, असे अतुल यास सांगितले होते. ३ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अतुल हा घरी जेवण करत असताना रोहन बनकर, वैभव उगले आणि सुशांत उपदेशे असे तिघे लाल रंगाच्या स्कुटीवर फिर्यादीच्या घरी आले. विशाल कळकुंभे याने तुला बोलावले असे म्हणून ते अतुलला सोबत घेवून गेले. रात्री नऊ वाजेच्यासुमारास अतुलच्या मोबाइलवरुन सागर जाधव याने फिर्यादीला फोन केला व विशाल कळकुंभे आणि अतुल यांच्यात मारामारी झाली असून त्यात अतुल गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
माहिती मिळताच फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा अमर अशा दोघांनी घाटी गाठले. मात्र, तेथे अतुलचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. फिर्यादीने सागर जाधवकडे चौकशी केली, तेंव्हा विशाल कळकुंभे, रोहन बनकर, वैभव उगले आणि सुशांत उपदेशे यांनी अतुलला ईटखेडा परिसरात आणून मारहाण केली. तसेच विशाल याने अतुलच्या पोटात चाकू मारला. अतुलच्या पोटातून रक्त निघत असल्याने सुमीत बिरारे आणि मी त्याला घाटीत आणल्याचे फिर्यादीला सांगितले असल्याचे तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन विशाल कळकुंभेसह इतरावर सातारा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहन बनकर, वैभव उगले, सुशांत उपदेशे या तिघांना मध्यरात्री पकडण्यात पोलिसांना यश आले. तर घटनेपासून मुख्य आरोपी विशाल कळकुंभे हा पसार झाला होता. तो जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे असल्याचे समजताच बदनापूर, परतूर पोलीस व जालना नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. परतूर भागातील नाकेबंदी दरम्यान विशाल मिळून आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सांगितले.