मुंबई प्रतिनिधी । एम्सच्या डॉक्टर समितीने दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा व्हिसेरा अहवाल सीबीआयकडे सोपविला आहे. मीडिया रिपोर्टनुसार एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणतेही विष आढळले नाही. यानंतर आता कॉंग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सुशांत प्रकरणात एम्सचा रिपोर्ट आल्याने भाजपचे तोंड काळे झाले असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकणाविषयी सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स रुग्णालयाने जो अहवाल दिला आहे त्यावरुन हे स्पष्ट झालेय की त्याच्या शरीरात विषाचा कोणताही अंश नव्हता. भाजपचा कट उघडकीस आला आहे. तसेच गुप्तेश्वर पांडेला व्हीआरएस असाच नाही मिळाली. ज्या घृणास्पद मार्गाने मुंबई पोलिसांची बदनामी झाली, महाराष्ट्राचा अपमान झाला, महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही’ पुढे सचिन सावंत म्हणाले की, ‘राजकीय षडयंत्रांतर्गत तीन एजन्सी महाराष्ट्रात आणल्या गेल्या. सीआरपीसी आणि संघराज्य प्रणालीचा बोजवारा उडवण्यात आला. बिहार पोलिसांनी याचा वापर राजकारणासाठी केला. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना दोष देण्यात आले. मोदी सरकार पुरस्कृत गोदी मिडिया ट्रायलचा आम्ही निषेध करतो. ‘ असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
















