नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय बारावीला आवश्यक नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) या संस्थेने घेतला आहे. या निर्णयाचा पुढील शैक्षणिक वर्षात मोठा परिणाम होणार आहे.
आता आपल्याला इंजिनिअर म्हणून करियर करायचं असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहेत. तशा प्रकारचं नवं धोरण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केलं आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे तीन विषय असणं बंधनकारक होतं. तो अडथळा आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (AICTE) नव्या धोरणाने दूर झाला आहे. AICTE ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांपैकी कोणतेही तीन विषय बारावीसाठी असतील तरीही आता इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.
इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी सामान्य विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण आवश्यक आहेत. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असलं तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या निर्णयाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल असं मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.