नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases spike in India) होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, गेल्या तीन-चार दिवसांत प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. आम्ही राज्यांना सतत मार्गदर्शन करत आहोत, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. लव अग्रवाल म्हणाले, व्हायरस वेगाने लोकांना संक्रमित करत असून त्यासंदर्भात आपल्याला मिशन मोडमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. जगात सध्या ३ लाख ३० हजार ३७९ ओमायक्रॉन प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत या प्रकारामुळे जगभरात ५९ मृत्यू झाले आहेत. ओमायक्रॉनची दक्षिण आफ्रिकेत ९६% प्रकरणे, यूकेमध्ये ५९% प्रकरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संक्रमन दुप्पट होण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस आहे. ओमायक्रॉनच्या सुरक्षेबाबत अजून डेटा येणे बाकी आहे. असे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जेव्हापासून ओमायक्रॉनची प्रकरणं समोर येत आहेत, तेव्हापासून भारतीय आरोग्य व्यवस्थेकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केंद्रीय पथकं पाठवून राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, संसर्गातून बरे झाल्यानंतर ९ महिने प्रतिकारशक्ती राहते. भारतातील तीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती १० महिने टिकते. मात्र लस प्रामुख्याने रोगापासून बचाव करणारी आहे. संसर्ग प्रतिबंधित नाही.