अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाली. यानंतर प्रशासनाने मध्यरात्री संचारबंदीचे आदेश काढले. पुढील ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.
सराफ बाजार परिसर व्यापाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. लहान मुलांच्या भांडणातून दंगल झाल्याचा अंदाज आहे. दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, 30 दंगलखोरांना अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तर लहान मुलांच्या खेळण्यावरून दंगल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला असून अमळनेरात तणाव पूर्ण शांतता आहे. दरम्यान, अमळनेर शहरात काही समाजकंटकांनी दगडफेक केली त्यामुळे दोन समाजातील लोक आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली. सदरची दगडफेक झाल्याची खात्री झालेली असल्याने अमळनेर शहरात शांतता भंग झाली आहे. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता फौजदारी प्रकीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याबाबत खात्री झाली असल्यामुळे अमळनेर शहरात दि. 10 जून 2023 रोजीच्या सकाळी 11 वाजेपासून ते दि. 12 जून रोजीच्या सकाळी 11 वाजेपावेतो संचारबंदी आदेश लागू करीत असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था/ संघटना यांचे विरुध्द प्रचलित कायद्यात नमुद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल, असेही आदेशात म्हटले आहे. तर सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलिस, रुग्णसेवा, दुध व पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच शहरातील सरकारी/खाजगी बँका पतसंस्था, विवाह व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.