मुंबई (वृत्तसंस्था) अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल जयसिंघानीला मुंबईत आणण्यात आलं आहे. त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलं आहे. तो ७२ तास चकवा कसा देत होता?,त्याला पकडताना काय काय अडचणी आल्या?, त्याच्या अटकेमागचा संपूर्ण घटनाक्रमच मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितला.
नेमकं काय आहे प्रकरण !
अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अमृता यांना एक कोटी रुपयांच्या लाचेचीही ऑफर दिली होती. तसेच त्यांना टेक्स्ट मेसेज, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी उल्हानगरला जाऊन अनिक्षा हिला अटक केली होती.
अनेक वर्षापासून फरार होता अनिल जयसिंघानी !
अनिल जयसिंघानी हा बऱ्याच वर्षांपासून फरार होता. मुंबई पोलिसांनी पाच दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवून त्याला अटक केली आणि मुंबईत आणलं. मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेची पाच पथकं तयार केली होती. ही पाच पथकं वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनिल जयसिंघानीचा शोध घेत होती. अनिल जयसिंघानी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःचं अस्तित्त्व लपवत होता. मात्र मुंबई पोलिसांनी पाच दिवस शोध मोहीम राबवून अनिल जयसिंघानीला अटक केली. तांत्रिक विश्लेषनात सदर आरोपी हा महाराष्ट्रातील शिर्डीतून गुजरात मधील बार्डोली येथे गेल्याचे आढळून आले. यानंतर गुजरातेत गुन्हे शाखेचे तीन पथके पाठवण्यात आले होते. या पथकांनी गुजरात मधील सुरत पोलिस तसेच बडोदरा येथील पोलिसांशी समन्वय करत गुजरातमध्ये मोहिम राबवली. अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.