जळगाव (प्रतिनिधी) येथील बीएचआर पतसंस्थेमध्ये ठेवेदारांचे बुडालेले पैसे परत मिळावे यासाठी प्रशासकाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेचे हजारो ठेवीदार असून, सध्या या संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पतसंस्थेमध्ये
ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या असून, त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत कोणताही ठोस उपाय दिसत नाही. प्रशासकाच्या नियुक्तीअभावी ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आणि निराशा निर्माण झाली आहे. सदर पतसंस्थेमध्ये प्रशासक नेमण्यात येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे ठेवीदारांच्या हक्काचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन गंभीर संकटात आले आहे. काही ठेवीदार आर्थिक ताणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. या परिस्थितीत ठेवीदारांना न्याय मिळावा आणि त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी प्रशासकाची तातडीने नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. तरी, आपल्याला विनंती आहे की, तातडीने प्रशासक नेमून ठेवीदारांचे बुडालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि ठेवीदारांना दिलासा द्यावा, असे या पत्रात म्हंटले आहे. तसेच आपली मदत आणि हस्तक्षेप याप्रकरणात न्याय मिळवून देईल अशी आशा असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.