मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टारंट बंद ठेवण्यात आले असून पार्सल सुविधा सुरू आहे. आता राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार, असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितलं की, सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर भुजबळ म्हणाले की पूर्वीप्रमाणेच ५ रुपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे, असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.
शिवभोजन थाळी अनेक गरजूंसाठी मोठा आधार आहे. अवघ्या पाच रुपयांत अनेकांची भूक या योजनेतू भागवली जाते. मात्र कडक निर्बंध असताना ही शिवभोजन थाळी मिळणार की नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. हीच बाब लक्षात घेत राज्य सरकारने हा महत्त्वाच निर्णय घेतला.