मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे अटक प्रकरणामुळे टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात पहिला फटका हा गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसणार आहे. वाझे प्रकरणामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पद गमावण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे प्रकरणात नवी माहिती येत आहे. वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या वातावरणात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीर्घ काळ चर्चा केली. लवकरच मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. वाझे प्रकरणामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पद गमावण्याची शक्यता आहे. वाझे प्रकरणामुळे विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे. एकाच पोलिसाचे जेमतेम १७ वर्षात दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. सचिन वाझे या अधिकाऱ्याचे एकदा ख्वाजा युनुस चकमक प्रकरणात आणि आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणून ठेवल्याप्रकरणी निलंबन झाले. मुंबई पोलिसांच्या क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचा एपीआय दर्जाचा अधिकारी उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके आणून ठेवतो असे राज्याच्या इतिहासात पहििल्यांदाच घडले आहे. यामुळे राजकीय पातळीवर डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न ठाकरे सरकारने सुरू केले आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह या दोघांचा राजीनामा घेऊन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे समजते तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन दूर करावे अशी मागणी शिवसेना करत असल्याचे वृत्त आहे.