मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नेहमी नवनवे आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समीर वानखेडे यांच्यावर तोफ डागल्यानंतर माहिती दिल्यानंतर मलिक यांनी भाजपकडं मोर्चा वळवला. त्यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली. ‘सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरू केला होता. तसंच, अँटिलियासमोर बॉम्ब प्लान्ट करण्याचं कामही त्यांनीच केलं, सरकारला अंधारात ठेवून हे सगळं केलं गेलं. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला, तेव्हा देखील मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. सगळी माहिती समोर आल्यानंतर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरू होईल हे कळल्यानंतर भाजपच्या मदतीनं अनिल देशमुख यांच्या विरोधात ई मेलद्वारे तक्रार करण्यात आली. परमबीर यांनी तक्रार करताच काही लोकांनी या प्रकरणात सीबीआयमार्फत एफआयआर दाखल करून घेतला. एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, असा घटनाक्रमच मलिक यांनी उघड केला. ‘तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या. जे काही तुम्ही करत आहात, त्याचं उत्तर आम्ही देऊ, असं पवारसाहेबांनी सांगितलंच आहे. देशमुख साहेबांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला आहे. जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत,’ असंही मलिक म्हणाले.