अहमदनगर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी कायद्यासंदर्भात तयार केलेला मसुदा चौथ्यांदा अमान्य केला. केंद्र सरकारच्या वतीने भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी अण्णांची भेट घेऊन त्यांना नव्या प्रस्तावाचे प्रारूप सादर केेले. मात्र अण्णांचे समाधान झाले नसल्याने महाजन यांची शिष्टाई निष्फळ ठरली. त्यामुळे उद्यापासून उपोषणाला बसणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलंय.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करु नये म्हणून भाजपचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत होते. परंतु त्यांची ही मनधरणी फोल ठरलीय. अण्णांनी भाजपच्या आश्वाससनांकडे दुर्लक्ष करत उपोषण करणारच, असा एल्गार पुकारलाय. त्यामुळे शनिवार, ३० जानेवारी रोजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याच्या निर्णयावर अण्णा ठाम आहेत. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी दोन वेळा अण्णा हजारे यांची भेट घेतली. आपण या वयात उपोषण करु नये, अशी विनंती करत केंद्र सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन त्यांनी अण्णांना दिलं. अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. आज केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी राळेगण येथील उपोषणावेळी अण्णांच्या विविध मागण्यांचा विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे लेखी आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होेते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी फडणवीस आणि महाजन यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री कैलाश चौधरी, कृषी सचिवांशी चर्चा केली. या समितीतील शासकीय सदस्य, कार्यकक्षा, कालमर्यादा आदींबाबत प्रारूप प्रस्ताव तयार करण्यात आला. तो घेऊन महाजन राळेगणसिद्धीला आले होते.
गिरीश महाजन यांनी दिलेल्या प्रारूप प्रस्तावाचा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे तज्ज्ञ अभ्यास करून प्रस्ताव स्वीकारायचा किंवा नाही याविषयी निर्णय घेतील. आम्ही चर्चेस तयार आहोत. मात्र, आता ठोस निर्णयाची आवश्यकता आहे. असं अण्णा हजारे म्हणालेत.