भुसावळ (प्रतिनिधी) जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत शनिवारी पासबुक अपडेट करण्यासाठी ग्राहकांनी अशी गर्दी केली होती. एकच खिडकी उघडी असल्याने पासबुक अपडेटच्या कामासाठी ग्राहकांना तासभर रांगेत उभे राहावे लागले. या ठिकाणी बँकेने पंखा देखील लावला नाही, यामुळे ग्राहकांना उकाड्याचाही त्रास सोसावा लागला.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पासबुक अपडेट करण्यासाठी केवळ एकच खिडकी ठेवण्यात आली आहे. शहरात कामगार, नोकरदार व सेवानिवृत्तांची संख्या अधिक असल्याने बँकांमध्ये १ ते १० तारखेच्या दरम्यान अधिक गर्दी असते. शनिवारी जामनेररोडवरील स्टेट बँकेत केवळ पासबुक अपडेट करण्यासाठी ग्राहकांना तासभर रांगेत उभे रहावे लागले. काँऊंटरच्या आतील कर्मचाऱ्यांना एसी व पंख्यांची सुविधा आहे, मात्र रांगेत असलेल्या ग्राहकांसाठी बँकेच्या प्रशासनाने पंखा देखील लावलेला नाही. यामुळे ग्राहकांना उकाड्यातच उभे राहावे लागले. रांगेत जेष्ठ नागरिकांसाठी बाकडे किंवा खुर्चांचीही व्यवस्था नसल्याने सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला. बँकेने ग्राहकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजप वैद्यकिय आघाडीचे नाशिक विभागाचे सहसंयोजक डॉ. नी.तू. पाटील यांनी केली आहे.