पुणे (वृत्तसंस्था) पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना पुण्यातल्या कोंढवा (Kondhwa) परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये घडली आहे. कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनमधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणं खरोखर कठीण काम होतं. कारण ती सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती. घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे. मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये कुत्र्याची 22 पिल्लंदेखील होती. कित्येक दिवसांपासून हा पीडित लहान मुलगा कुत्र्यांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ही गोष्ट सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात अल्यानंतर त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला आणि त्यांना मुलाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली.
या तक्रारीवर कारवाई करून फाउंडेशनशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. मुलाच्या आई-वडिलांची तोंडी कानउघडणी करून समाजसेवक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा ते संबंधित घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसलं. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचं आढळलं. त्यानंतर बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली होती.
या भीषण घटनेबद्दल माहिती देताना ज्ञान देवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे यांनी ‘पुणे मिरर’ला सांगितलं की, ‘घरातून रेस्क्यू केलेलं मूल कुत्र्यासारखं वागत असल्याचं पाहून आम्हाला धक्का बसला. कित्येक दिवसांपासून योग्य पोषण न मिळाल्यानं तो मुलगा अशक्त झाला आहे आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर किंवा इतर कोणतीही व्यवस्था नव्हती.
ते बाहेरून जेवण ऑर्डर करत होते. या जोडप्याचा व्यवसाय होता; पण तो बंद झाला आहे. तेव्हापासून हे दोघे बेरोजगार आहेत. घरामध्ये स्वच्छतेचा प्रचंड अभाव होता. जेवणाचे रॅपरसुद्धा घरामध्येच पडलेले होते. सर्वात वाईट म्हणजे कुत्र्यांनी घरामध्ये ठिकठिकाणी मलमूत्र विसर्जन केलेलं होतं. घरातली दोन कुत्री मेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुलाला आंघोळही घातलेली नव्हती. त्यामुळे सोसायटी व परिसरात दुर्गंधी पसरली होती. या जोडप्यानं आपल्या मुलाला कुत्र्यांसह घरात कोंडून ठेवलं होतं. त्यामुळे तो आता कुत्र्यांसारखं वागू लागला आहे.’
‘शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवलं गेलं होतं; पण तो कुत्र्यासारखं वागू लागला आणि इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला शाळेत पाठवणं बंद करून घरात डांबून ठेवलं होतं. त्यांनी त्याला बाहेर काढलं नाही. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं, तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या आकाशाकडे आणि इतर गोष्टींकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता. एकंदरीत तो आपली ओळखही विसरला असल्याचं निदर्शनास आलं. आम्ही त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे,’ असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं.
सध्या हा मुलगा कुत्र्यासारखा वागतो आहे. म्हणून त्याला योग्य समुपदेशनाची गरज आहे. मुलाला सांभाळण्यास सक्षम नसलेल्या पालकांकडे आम्ही मुलाला परत देऊ शकत नाही, असं अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितलं आहे. ही घटना फारच धक्कादायक असून, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. लहान मुलांना प्राण्यांच्या सान्निध्यात कोंडून ठेवणं आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होणं, हा एक प्रकारचा गुन्हा आहे.